आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात २५ जणांचे पथक   

पुणे : शहरात वळवाच्या पावसाने गेल्या आठवड्याभरापासून दमदार हजेरी लावली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणासाठ्यात देखील वाढ होत आहे, तर दुसरीकडे शहरात विविध ठिकाणी पाणी साचत आहे. यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून पुणे महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात प्रत्येकी २५ जणांची पथक तातडीच्या कामांसाठी तैनात करण्यात आली असून त्यांच्याकडून खबरदारी घेतली जात आहे.  
 
पुण्यासह इतर शहरात देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यात वाहने वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत, तर अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अशी परिस्थिती सध्या तरी पुणे शहरात निर्माण झाली नसली तरी धोका कायम आहे. मुसळधार पाऊस झाल्यानंतर रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त होत आहे, तर ओढ्या, नाल्याचा पाण्याचा प्रवाह वाढत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. त्यामुळे पालिकेची यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे. पालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह दोन्ही अतिरिक्त आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
 
पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची नुकतीच आढावा बैठक पार पडली, तसेच मॉक ड्रीलचे देखील आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अधिकार्‍यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालिकेने शहरात पाणी साचण्याची २०१ ठिकाणे निश्चित केली असली तरी प्रत्यक्षात याहून अधिक ठिकाणांवर पाणी साचत आहे. साचलेले पाणी काढण्यासाठी पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, नोव्हेंबर २०१५ मध्ये, मुसळधार पावसामुळे धानोरी, विश्रांतवाडी, लोहगाव, टिंगरेनगर या भागात भीषण पूर आला. त्यामुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आंबिल ओढा परिसरात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे यंदा या भागात अधिक लक्ष ठेवण्यात आले आहे.
 
गेल्या वर्षी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. तसेच पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा धडा घेत पालिकेने यंदाच्या वर्षी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली आहे. शहरातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२२ मिलीमिटर आहे. बदलत्या पर्जन्यमान आणि वाढत्या शहरीकरणामुळे २००५ पासून वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मि.मी.पर्यंत वाढले आहे. मोठा पाऊस झाला की रस्ते जलमय होतात. तर अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त होते. सिमेंट क्राँक्रिटचे रस्ते असल्यामुळे पाणी साचण्याची ठिकाणी वाढली आहेत.
 
पावसाळ्यात अतिवृष्टी, कमी वेळेत अधिक पाऊस होणे, पाणी साचणे, घरांमध्ये पाणी शिरणे, वृक्ष अथवा फांद्या कोसळणे अशा घटना घडतात. अशा वेळी मलनिस्सारण विभाग, पथ विभाग, उद्यान विभाग, अग्निशमन विभाग, क्षेत्रीय कार्यालये आदी घटक कार्यरत असतात. आपत्तीच्या वेळी विविध ठिकाणांहून नागरिकांचे दूरध्वनी तसेच विविध यंत्रणांकडून माहिती येत असते.अशा वेळी सर्व विभागांशी समन्वय साधून मदत व बचावकार्य करावे लागते. त्यासाठी पालिकेतील आपत्ती व्यवस्थापनाच्या नियंत्रण कक्षात विशेषत: रात्रीच्या वेळी प्रशासकीय अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

साचलेले पाणी काढण्यासाठी पालिकेकडे तीन प्रकारची यंत्र

शहरातील रस्त्यांवर पाणी साचून राहते, त्यामुळे वाहन चालकांना तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे साचलेले पाणी काढण्यासाठी नागरिकांकडून अग्निशमन दलाला फोन केला जातो. मात्र, पाणी काढण्याचे काम या विभागाचे नसून पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे असून त्यासाठी कर्मचारी तीन यंत्रणांसह तैनात करण्यात आले आहे. जेटींग मशीन, रिसायकलींग मशीन आणि पंप या तीन मशीनद्वारे पाणी काढले जाते. त्यामुळे नागरिकांना अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याऐवजी पालिकेला संपर्क साधणे आवश्यक आहे.
 
शहरात कोणत्याही प्रकारची आपत्तीजनक घटना घडू नये, यासाठी यंत्रणा लक्ष ठेवून आहे. काही घटना घडल्यास तात्काळ उपाय योजना करण्यासाठी कर्मचार्‍यांची टीम तैनात करण्यात आली आहे. नुकतीत शहरात मॉक ड्रील घेण्यात आली होती. पालिकेकडे असलेल्या मशीनची तपासणी करण्यात आली आहे, आवश्यक दुरुस्ती करण्यात आली आहे. आढावा बैठकीत सर्व कर्मचार्‍यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

 - गणेश सोनुने, प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका.

पालिकेची यंत्रणा...

पावसामुळे शहरातील घडामोडींवर पालिका आयुक्तांसह 
दोन अतिरिक्त आयुक्तांचे लक्ष
जेटींग मशीन १५ क्षेत्रीय कार्यालयात प्रत्येकी २
रिसायकलिंग मशीन प्रत्येकी १
पंप : ७५
१५ क्षेत्रीय कार्यालयात २५ जणांचे प्रत्येकी एक पथक तैनात
१५ क्षेत्रीय कार्यालयाचे १५ सहायक आयुक्तांवर जबाबदारी
 

Related Articles